Monday, December 28, 2015

पोट साफ करण्यासाठी एरंडेल पंचकर्म - समज-गैरसमज

हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये अवरोध, संधिवात, ऑस्टिओपोरोसिस, किडनीचे काम बंद होणे, मेंदूचे विकार असणे, अशा कुठल्याही प्रकारच्या रोगासाठी इलाज करते वेळी विरेचन करणे अत्यावश्‍यक असते. त्यामुळे पोट नेहमी साफ असावे. विरेचनाशिवाय केलेले उपचार तेवढे लागू पडत नाहीत. विरेचन वर्षभर केव्हाही करता येते. शरद ऋतूत विरेचन केले तर शरीरात संचित झालेल्या पित्ताचे विसर्जन चांगल्या प्रकारे होऊ शकते.

खरे तर लहानपणापासून मुलांना दर आठवड्याला पोट साफ करण्यासाठी विरेचनीय द्रव्यांची मदत देणे आवश्‍यक असते. रोज शौचाला साफ होत असली तरी काही प्रमाणात पोटात राहिलेला मळ आठवड्या-पंधरा दिवसाला साफ करणे गरजेचे असते. या दृष्टीने आठवड्यातून एकदा छोटे विरेचन करून घेणे आवश्‍यक असते.
विरेचन झाल्यानंतर आरोग्याचा आनंद अनुभवता येतो, हलकेपणा अनुभूत होतो, चेहऱ्यावर उजळपणा येतो, कडक झालेले शरीर व आखडलेले सांधे बऱ्याच प्रमाणात मोकळे होतात. मनुष्य पुन्हा सामान्य जीवन जगू लागतो, त्याला भूक लागू लागते, जेवण जाऊ लागते. हे सर्व पाहिल्यानंतर पोट साफ असण्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते.
यासाठी एरंडेल साधारणतः दोन मोठे टेबलस्पून म्हणजे 15 मि.लि. देणे गरजेचे असते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी दोन-तीन जुलाब होतील. अर्थात लहान मुलांना हे प्रमाण थोडे कमी म्हणजे एक चमचा एवढ्या प्रमाणात देता येते. प्रत्येकाचा कोठा वेगळा असल्याने त्यानुसार विरेचनाची मात्रा ठरवावी लागते. एक चमचा एरंडेल दिल्यावर जुलाब झाले नाहीत, तर पुढच्या आठवड्यात दीड चमचा एरंडेल देऊन पाहावे. एरंडेल घेण्यास लहान मुलांचा, बऱ्याच वेळा मोठ्यांचाही नकार असतो. अशा वेळी संबंधित व्यक्‍तीला तोंड आ करून आकाशाकडे पाहायला सांगितले, नाक बंद केले व मध्यभागी एरंडेल ओतले तर ते पटकन खाली जाते. त्यानंतर मीठ लावून आल्याचा तुकडा, किंवा भाजलेला ओवा, सुपारी वगैरे दिल्यास गिळगिळीतपणा घालवता येतो. स्वादिष्ट विरेचन चूर्ण किंवा साधे त्रिफळा चूर्ण, गंधर्वहरीतकी रात्री झोपण्यापूर्वी घेण्यानेही विरेचन घेता येते किंवा आठवड्याचे सौम्य विरेचन घेण्यासाठी गोळ्या वगैरेही मिळू शकतात, त्या वैद्यांच्या सल्ल्याने ठरवून घ्याव्यात. प्रकृतीनुसार विरेचनाचे औषध व त्याचे प्रमाण ठरवावे लागते; म्हणजे ते अधिक गुणकारी ठरते. कुटकी नावाच्या वनस्पतीचा काढा (पाच-सात ग्रॅम कुटकी दोन कप पाण्यात उकळून अर्धा कप उरेपर्यंत बनविलेला काढा) रात्री झोपण्यापूर्वी घेता येतो. कुटकी चवीने कडू असल्याने काढा पटकन घेऊन टाकणे, हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. यानंतर मुखशुद्धीसाठी ओवा, आले वगैरे काहीतरी घ्यावे.
ज्या व्यक्‍ती आठवड्याने नाही झाले, तरी पंधरा दिवसांनी किंवा महिन्याच्या अंतराने पोट साफ करून घेण्याकडे लक्ष ठेवतात, त्यांना रोगांना दूर ठेवता येते, त्यांचे शरीर हलके राहते. असे नियमितपणे करत राहिल्यास पंचकर्मातील मोठे विरेचन वयाच्या पन्नाशीला केले तरी चालते.

पंचकर्मातील विरेचनाच्या दिवशी आवेग येत असताना चहा किंवा गरम पाणी यांच्याव्यतिरिक्‍त काही घेऊ-खाऊ नये. या दिवशी संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी तूप-मीठ-भात, तांदळाची पेज वगैरे घ्यावे. असे केल्यास खरा फायदा मिळू शकतो.
हल्ली मात्र पोट साफ होण्याचे तंत्र सांभाळले जात नाही, म्हणून सध्याच्या काळात पस्तिशीच्या आसपासच पंचकर्म करून घेण्याची आवश्‍यकता दिसते. आपल्या शरीराला न पचणाऱ्या वस्तू खाल्ल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

विरेचनाच्या दिवशी वा विरेचनाच्या दुसऱ्या दिवशी प्रवास करू नये. या दिवशी शांत बसावे. पोटाला कुठल्याही प्रकारे श्रम होतील, वेडेवाकडे हादरे बसतील असे काहीही करू नये. विरेचनाच्या दोन दिवसांनंतर तेलाची अनुवासन बस्ती घेतली की विरेचन विधी पूर्ण झाला असे म्हणता येते. ही विरेचनानंतर दोन दिवसांनंतर घेतलेली बस्ती ही बस्ती म्हणून मोजायची नसते, कारण विरेचनामध्ये खालच्या बाजूला राहिलेली अशुद्धी साफ करण्यासाठीच या बस्तीचा उपयोग होतो.

आठवड्याचे विरेचन असो वा पंचकर्मातील मोठे विरेचन असो, त्यानंतर लगेच जडान्न खाण्यात आले तर त्रास होऊ शकतो, शिवाय विरेचनाचा खरा फायदा मिळत नाही. पोट साफ होणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेतले, तर रोगांना सामोरे जायची वेळ येणार नाही.

हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये अवरोध, संधिवात, ऑस्टिओपोरोसिस, किडनीचे काम बंद होणे, मेंदूचे विकार असणे अशा कुठल्याही प्रकारच्या रोगासाठी इलाज करते वेळी विरेचन करणे अत्यावश्‍यक असते. त्यामुळे पोट नेहमी साफ असावे. विरेचनाशिवाय केलेले उपचार तेवढे लागू पडत नाहीत. म्हणून विरेचन वर्षभर केव्हाही करता येते.

तसे पाहिले तर विरेचन शरद ऋतूत केले तर शरीरात संचित झालेल्या पित्ताचे विसर्जन चांगल्या प्रकारे होऊ शकते. तेव्हा पित्तप्रकृती ताब्यात ठेवण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी विरेचन करायचे असेल तर शरद ऋतूत करायला हरकत नाही. पण रोग झाल्यावर शरदऋतूपर्यंत थांबून राहणे सयुक्‍तिक नाही. अशा वेळी कधीही विरेचन केले तरी चालते.

No comments:

Post a Comment